Sunday, 30 December 2018

30 डिसेंबर दिनविशेष

आजचा दिनविशेष

३० डिसेंबर १९७१ :-

भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह, अंतराळ युगाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई स्मृतिदिन. आर्यभट्टाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह आकाशात झेपावले आणि ते यशस्वीपणे काम करत होते. या अंतरीक्ष संशोधनामध्ये साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी कारणीभूत आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलम सुद्धा साराभाईंना प्रेरणास्रोत मनात असत.

"अवकाश संशोधन हा आमच्या चैनीचा मुद्दा नाही. आम्हाला आर्थिकदृष्ट्या विकसित देशांसोबत कोणतीही स्पर्धा करायची नाही.समाजाचे खरेखुरे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्हाला प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हवा आहे" -- डॉ विक्रम साराभाई

Sunday, 16 December 2018

मन का बोलावते त्या दिवसांना

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.
लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.

Saturday, 24 November 2018

महाराजांबद्दल थोडेसे

*महाराजांबद्द्ल दोन शब्द*

■कुठल्याही कोंबड्या बकऱ्याचा बळी न देता स्वतःचा करंगळी कापून  शंकराच्या मंदीरात रक्ताचा अभिषेक घालणारा  एकमेव राजा.

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही देवाचे नाव नाही गणपतीचे सुद्धा नाही.......

■शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवरशी करत बसले नाहीत.

■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले............

■ गड जिंकल्यावर तीथे सत्यनारायण कधी घातला नाही.......

■अमावस्या अशूभ मानली जाते काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या राञी व्हायच्या कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे.

■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या

■महाराजांनी दैववाद अंधश्रद्धा कधीच मानली नाही कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......

◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम....

Tuesday, 28 August 2018

ideological subversion

--------------------------------------
*How to brainwash a nation?*
--------------------------------------
'रावणाचे ग्लोरिफिकेशन' ह्या विरोधात मी फेसबुकवर दोन पोस्ट्स केल्या होत्या. त्यानंतर एका ग्रुपवर ह्या विषयावर चर्चा चालू होती. एकंदरीतच रामाला आपल्या देशात विरोध कसा काय होऊ शकतो हा मुद्दा होता. त्या ग्रुपवर सौरभ वैशंपायनने त्यावेळी 'सबवर्जन' हा विषय काढला. सबवर्जन सोबत जोडून नाव आलं - 'युरी बेझमेनोव्ह' उर्फ 'टॉमस शुमन'.

युरी बेझमेनोव्ह ह्या माणसामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याविषयी अव्हेलेबल असलेले सर्व व्हिडीओज शोधून काढले, डाउनलोड करून बघितले.

युरीने जे काही मांडले आहे, त्याने डोकं चक्रावून गेलं.
"ऑ!! असंही असू शकतं? हे सर्व इतकं प्लॅन्ड असू शकतं?" ह्या प्रश्नाने भंडावून जायला झालं.

भारतात सध्या जे चालू आहे आणि आधी जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्त्व आहे.

त्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडंसं.

युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९ साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.

कॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.

नंतर १९६० च्या दशकात युरी रशियाच्या केजीबी ह्या गुप्तहेर संस्थेत रुजू झाला. भारताविषयी अभ्यास असल्यामुळे केजीबीतर्फे त्याची नेमणूक भारतात करण्यात आली.

गुप्तहेरी करण्यासाठी युरी भारतात संपादक बनून आला. नंतर भारताच्या, इथल्या माणसांच्या, संस्कृतीच्या प्रेमात पडला. केजीबी जगभरात आणि भारतात जे काही करते आहे ते खूप चुकीचं आहे, कम्युनिस्टांच्या स्वार्थासाठी इतर देशांचा, तिथल्या लोकांचा बळी जात आहे, ह्या जाणिवेने त्याने केजीबीला सोडचिठ्ठी दिली. जीव वाचवण्यासाठी भारतात हिप्पी बनून राहिला आणि नंतर कॅनडाला पळून गेला. १९९३ च्या सुमारास त्याचा गूढ मृत्यू झाला. कसा ते कुणालाच समजलं नाही.

"Deception was my job" गुप्तहेर म्हणून तो करत असलेल्या कामाचं स्वरूप युरीने एका वाक्यात मांडलं आहे.

खोटं असलेलं खरं बनवून दाखवणं, समाजाला भुरळ पाडणं, आपल्या बोलावत्या सरकारला हवं ते चित्र उभं करणं आणि परक्या राष्ट्रांमध्ये जनमत आपल्याला हवं त्या बाजूला वळवणे, हे काम युरी आणि त्याच्यासारखे अनेक गुप्तहेर करत होते आणि आजही करत आहेत.

ह्या सर्वाला त्याने 'सबव्हर्ट' हा शब्द वापरला आहे.
सबवर्जन हेच युरी आणि अनेक गुप्तहेरांचं काम आहे.

हि सबवर्जनची थिअरी 'सुन त्झे' ह्या एका चायनीज विद्वानाने २००० वर्षांपूर्वी मांडली.
रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शत्रूला काबीज करणं, त्याच्या देशात आपल्याला अनुकूल मत पैदा करणं आणि मग हळूहळू शत्रूला काबीज करून घेणं हा ह्या थिअरी मागचा गाभा आहे.

आता हे सर्व करायचं तर त्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी, त्याची एक मेथडॉलॉजी असायला हवी. इतर देशांवर कंट्रोल करण्यासाठी केजीबी जे काही करत होती, किंवा आजही अनेक देश जे काही करत आहेत, त्याची तपशीलवार माहिती युरीने त्याच्या मुलाखतीत दिली आहे. इंटेरेस्टिंगली सबवर्जन हि एक लॉन्ग प्रोसेस आहे आणि ह्या सर्व देशांकडे ती अमलात आणण्यासाठी लागणारा संयम आहे.

एखाद्या देशात राजकीय, आर्थिक वा सामाजिक अस्थैर्य निर्माण करणं हा सबवर्जनचा उद्देश आहे. गुप्तहेर संघटनांच्या बजेटपैकी ८५% निधी ह्यासाठी वापरला जातो.

जिथे सामाजिक सीमारेषा फार मजबूत नसतात, जिथे समाज हा फार जास्त विचारी नसतो, जिथे देशाचे राज्यकर्ते स्खलनशील असतात, राजकीय नियंत्रण फार कमी असतं, त्या देशांना अशा पद्धतीने नियंत्रणात आणणं फार सोपं असतं.

सबवर्जनमध्ये असणारी एकेक पायरी बघितली तर कोणत्याही सजग नागरिकाला ती पायरी उदहरणासहित उमजून जाईल.

Demoralisation अर्थात समाजाचं खच्चीकरण करणे, हि एक पायरी त्यात आहे.
ह्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी आहे. एवढाच का? कारण ह्या कालावधीत एक पिढी शाळा कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडते. त्यावेळी आपल्याला हवे असलेली मूल्यं त्यांच्यावर बिंबवली तर त्यांचा कल बदलता येतो. कोवळ्या मनांवर आपली मतं लादणे आणि आपल्याला हवा तो प्रोपोगंडा राबवणं हे ह्या पायरीत केलं जातं. मग त्यांच्या पुस्तकात चुकीची माहिती छापणे हाही त्यातलाच एक भाग. उदाहरण डोळ्यासमोर आलं असेलच.

ह्याशिवाय समाजाचे असे जे आदर्श आहेत, ज्यांच्यावर सामान्यजन श्रद्धा ठेवून आहेत, त्यांना धक्का देणं, त्यांच्याविरुद्ध चुकीची विद्रोही माहिती पसरवणे हाही एक अजेंडा. असं झालं कि मग कर्ण चांगला वाटू लागतो, रावण हाही भाऊ असावा असा वाटतं आणि महिषासुर दिन साजरा केला जातो. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणं हा हेतू साध्य होऊ लागतो.

धार्मिक मान्यता, शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, अडमिनिस्टरेशन सिस्टीम, कायदा आणि सुव्यवस्था, कामगार यंत्रणा गढूळ करून असंतोष पैदा करणं हा देखील ह्याच पायरीचा भाग. मग त्यात आजूबाजूला चालू असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी, समाजघातक चळवळींना पाठिंबा दिला जातो.
वैचारिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांपेक्षा अविचारी, आततायी, प्रसिद्धीलोलुप लोकांना हेरून मोठं केलं जातं.
त्यात 'मीडिया' हा एक मोठा भाग हातात घेतला जातो. सर्वसामान्य दर्जाचे पत्रकार समाजाचा आणि देशाचा आवाज बनवले जातात. खोट्या आणि एकसुरी बातम्या मीडियामधून वारंवार प्रसारित केल्या जातात. समाजात अस्थैर्य निर्माण होईल असे सर्व प्रयत्न मिडियाद्वारे करवले जातात.

राजकीय सत्ता आणि न्यायव्यवस्था गढूळ केल्या जातात. पद्धतशीर रित्या गुंडांचं ग्लॅमरायझेशन केलं जातं. गुंड प्रवृत्तीची माणसं हीच हिरो वाटायला लागतात. सत्शील, सत्प्रवृत्त माणसाला बावळट आणि कुचकामी ठरवलं जातं. गुंड हे समाजशोषक नसून त्यांच्या परिस्थितिचे बळी आहेत, असं भासवलं जातं.

अतिसामान्य वकुबाची माणसं समाजाचं नेतृत्व हातात घ्यायचा प्रयत्न करतात.

शिक्षणाचं केंद्र असणारी कॉलेजेस अथवा विद्यापीठं ह्यात शिक्षण दुय्यम केलं जातं आणि प्राचार्य आणि विद्यार्थी, सरकार आणि विद्यार्थी ह्यांच्यात बेबनाव माजवला जातो.

स्त्रीवादि, समलिंगी, विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या राहतात.समाजाला अचानकरीत्या त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते.

एकंदरीत समाजात अशांतता माजवण्याचे, परकीय विचारसरणी बिंबवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले जातात.
ह्यालाच युरी 'Destabilization' असं म्हणतो.
Destabilization नंतर राजकीय कंट्रोल आणि मग आपल्याला हवा असलेला अजेंडा त्या देशात राबवणे.

एकदा समाजाचा कंट्रोल हाती आला कि समाजातील जी काही प्यादी अशांतता माजवण्यास उपयोगी पडलेली असतात त्यांनाच पद्धतशीररीत्या संपवलं जातं. नवीन राज्यकर्त्यांना त्या व्यक्तींची वा चळवळीची गरज राहिलेली नसते.

सबवर्जनसाठी उपयोगी पडणाऱ्या सामाजिक घटकांची एक यादीच युरीने एका दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे. हि यादी ऐकली/ वाचली तर धक्काच बसेल.

चित्रपटक्षेत्रातली मंडळी, स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारे लोकं, स्वत:भोवती वलय उभं करून स्वत:चं महत्त्व समाजात वाढवणारे स्वार्थी खोटारडे लोक ह्यांचा उपयोग समाजात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी केला जातो.

युरी म्हणतो, ह्या सर्वाला थांबवायचा उपाय आहे. आणि तो म्हणजे हे चालू होत असतानाच थांबवणे. ज्यावेळी समाजाची बेसिक मूल्यं परदेशी मूल्यांच्या पंखांखाली जाऊ लागतात त्या आधीच ते थांबवणं महत्त्वाचं असतं.

भारतात लहान मुलांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास छापून येतो, त्यांच्या कोवळ्या मनांवर आणि बुद्धीवर फुटीरतेचे संस्कार केले जातात, अचानक कुणीतरी कॉलेजातली मुलं एकदम मोठी होतात, त्यांना समाजाचं नेतृत्व मानलं जातं, मीडियातून एकाच बाजूच्या बातम्यांचा मारा होतो, चित्रपट क्षेत्रातली मंडळींना देश आपला वाटेनासा होतो- ह्या आणि अशा अनेक घटनांचं जणू भाकीत युरीने आपल्या मुलाखतीत मांडलं आहे.

आपल्या देशातल्या घटना असो वा इजिप्तमधली सो कॉल्ड राज्यक्रान्ति- सर्वांचा क्रम एकसारखा आहे.

रशियासारख्या देशाच्या एका एजंटने हि माहिती उघड उघड मांडली आहे. ह्यापलीकडे चालणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे असतील आणि त्या आपल्याला उभ्या आयुष्यात समजणार देखील नाहीत.

एखादा माणूस जीव तोडून सत्य लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो पण आपल्यावर असलेल्या खोट्याच्या प्रभावामुळे आपण सत्य स्वीकारत नाही. ह्याच गोष्टीला युरीने ideological subversion असं म्हंटलं आहे.

त्यामुळे समाजात घडणाऱ्या घटनांनी आपण जर भारावून जात असू किंवा त्याच बरोबर आहेत हे आपल्याला वाटत असेल तर आपण 'सबवर्ट' झालो आहोत, असत्याचा बळी झालो आहोत असं समजायला हरकत नाही.

*- सारंग लेले, आगाशी*

*References- युरी बेझमेनोव्हच्या मुलाखती आंतरजालावरील माहिती*

Saturday, 21 April 2018

जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची

*टेन्शन घ्यायचंच नाही*...
कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... *ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो*...
आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 
    
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.
     😄😄 *_नेहमी हसत रहा_* 😄😄

⚜ *_हा सुंदर जन्म पुन्हा नाही_*⚜

Sunday, 15 April 2018

डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी औषध

*ही कविता नसून औषध आहे:*
*डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*

माणूस काय करतो ?

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !

                बोलणं कमी झाल्यामुळे ,
                   प्रश्न निर्माण झालेत !
                     सारं काही असूनही ,
                    एकलकोंडे  झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

                आपल्या माणसांजवळ ,
                    व्यक्त झालं पाहिजे !
                   खरं खरं दुःख सांगून ,
                   मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !

             कुणाशी तरी बोला म्हणजे ,
                  हलकं हलकं वाटेल !
                 दुःख जरी असलं तरी ,
                   मस्त जगावं वाटेल !

येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो  ?
*आपल्या माणसाजवळच*,
गळ्यात पडून रडतो !

            *आपली माणसं* , *आपली माणसं* ,
              बाजारात मिळत नसतात !
                 नाती-गोती जपून ती ,
               निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
*आपली माणसं* जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

                 हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
                  काही कामाचे नसतात !
                   तुझी पाठ वळली की ,
                     कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी  आणून ठेव !

              रोबोटच्याच गळ्यात पडून ,
                   हसत जा , रडत जा !
                  शांत झोप येण्यासाठी ,
                  दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,

                   इथून पुढे भिशी कर ,
              हसण्याची अन रडण्याची !
               हीच खरी *औषधं* आहेत ,
            *डिप्रेशनच्या* बाहेर पडण्याची !!

......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....

जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज
छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण

कोणीतरी लिहिली
अन मला पाठवली
मला भावली आणि त्याहून जास्त पटली
आप्तेष्टांची काळजी वाटली म्हणून फॉरवर्ड  केली🌞

मराठी भाषा पोवाडा

पोवाडा मराठी भाषेचा

मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग...

ही भाषा असे कुणाकुणाची?
अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

अहो ही भाषा असे चक्रधरांची
ही भाषा असे झानदेवांची
ही भाषा असे तुकोबांची
नामदेव, सोपान, मुक्ताबाईची
गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची
हि भाषा असे रामदासांची
ही भाषा असे जीजाउंची
ही भाषा असे दादोजी कोंडदेवांची
हि भाषा असे मर्द मावळ्यांची
हि भाषा असे शुर शिवाजी राजांची
ही भाषा असे बेधडक मुरारबाजीची
ही भाषा असे विर तानाजीची, बाजीप्रभुंची
ही भाषा असे कान्होजी आंग्र्यांची
ही भाषा असे पेशव्यांची
ही भाषा असे विश्वासरावांची
हि भाषा असे आहिल्यादेवींची
ही भाषा असे शाहुमहाराजांची
ही भाषा असे टिळकांची
ही भाषा असे सावरकरांची
ही भाषा असे फुले, आंबेडकरांची
हि भाषा असे बाळासाहेबांची
हि भाषा असे राजठाकरेंची
हि भाषा असे तळागाळातल्या लोकांची
सह्याद्रीच्या मुलांची
सागराच्या लेकरांची
विदर्भातल्या लेकीसुनांची
मराठवाड्यातल्या पोरांची
खानदेशातल्या वडिलधार्‍यांची
हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची

अशी ही भाषा कित्येक मर्दांची
ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी

लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक,
नाटककार, संगीतकार, गायक,
डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक,
राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,
रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी,
किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती!

कवी कुसूमाग्रज, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, विभावरी शिरूरकर, हमिद दलवाई, आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख, बा भ बोरकर, यु म पठाण, सरोजीनी बाबर, विद्या बाळ, चिं त्र खानोलकर, जी ए कुलकर्णी, भा रा तांबे, गोविंद बल्लाळ देवल, लक्ष्मण गायकवाड, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सचिन तेंडूलकर, लक्ष्मण माने, दादासाहेब फाळके, प्रतिभाताई पाटिल, तुकडोजी महाराज, साने गुरूजी, गाडगे महाराज, गोंदवले महाराज, संत चोखामेळा, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, राजा ढाले, दत्ता सामंत, उद्धव ठाकरे, वसंतदादा पाटिल, शरद पवार, चिंतामणराव देशमुख, गोळवलकर गुरूजी, नामदेव ढसाळ, आण्णा हजारे, शांताबाई कांबळे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, राणी बंग, नरेंद्र दाभोळकर, विनोबा भावे, श्रीपाद डांगे, रामदास आठवले, पंडीता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, भिमसेन जोशी, धोंडो केशव कर्वे, पांडूरंग शात्री आठवले, डॉ. विजय भाटकर, अनिल काकोडकर, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, कृष्णा कांबळे, डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, अमोल पालेकर, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, रजनीकांत, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, सुलोचना, अरूण दाते, अजीत कडकडे, सुरेश भट, अनुराधा पौडवाल, बाबूराव बागुल, अवधुत गुप्ते, अजय अतूल, वैशाली सामंत, सुरेखा पुणेकर, दिलीप सरदेसाई, वेंगसरकर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, गंगाधर पानतावणे, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, बा सी मर्ढेकर, बालकवी, गुरू ठाकुर......
कितीतरी नावे घेतली तर त्यास दिवसही पुरायचा नाही*. या दैधिप्यमान रत्नांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले आहे.

सारे जण महाराष्ट्री जन्मती
अन सारे जण मराठी बोलती
किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान
भारत देशाचा वाढविती शान
असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी

१९१२, फेब्रूवारी २७,
जन्मले कवी कुसुमाग्रज
साजरा करती हाच मराठी भाषा दिवस
करा प्रतिज्ञा याच दिनी
मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी
मागे नाही कधी हटायाचे
सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी

खानदेशी, माणदेशी
आहिराणी, कोकणी
वर्‍हाडी, मालवणी
या सार्‍या बोलीभाषा
बहिणी बहिणी
सार्‍यांमुखी नांदती
सुखाने संसार करती
वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी

कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती
कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती
आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार
रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी

मराठी भाषा असे जगन्मान्य
तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य
तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य
त्या मराठीस त्रिवार मुजरा करून
मराठी भाषिकांना
शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

* वरती काही मान्यवर मराठी भाषिकांची नावे आली आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक महनिय व्यक्ती मराठी भाषिक आहेत. त्यांचीही नावे मराठीच्या इतिहासात आदराने घेतली जातात