Monday, 26 February 2018

मराठी दिन

आज मराठी भाषा दिन. खरं तर मराठी बोलणा-या प्रत्येकाचा, मग तो महाराष्ट्रात राहो, भारतात राहो, किंवा जगात कुठेही राहो. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. हा रोजचाच दिवस मराठीचा असला पाहिजे. मातृभाषा ही मातेएवढीच पवित्र आणि वंदनीय आहे. त्यामुळे मातृभाषा दिन एका दिवसापुरता न साजरा करता ३६५ दिवस साजरा व्हावा.

त्याचे स्वरूप उत्सवासारखे नसावे. पण व्यवहारात या भाषेचे महत्त्व किती आहे इतके प्रत्येकाला जाणवावे. मुंबईमध्ये राहणा-या मराठी माणसाने एक खुणगाठ बांधावी की, ही मायमराठी रस्त्यावर उतरल्यावरसुद्धा आपण बोलतो का? रिक्षा- टॅक्सीत बसल्यानंतर रिक्षा-टॅक्सीवाले हिंदी भाषिक असतील तर मराठी भाषिक हिंदीत बोलायला लागतो. त्या रिक्षा-टॅक्सीवाल्याला मराठी बोलायचा आग्रह धरत नाही. मुंबईच्या रस्त्यावर मराठी भाषा खुरटली. याचे कारण व्यवहारात आम्हाला मराठीचे महत्त्व मुंबईच्या बाजारातही असायला पाहिजे, हे जाणवत नाही. थोडा अधिक तपशिलात विचार केला तर त्याचे मुख्य कारण मराठी माणूस मूलत: व्यापारी प्रवृत्तीचा, व्यवसाय प्रवृत्तीचा नाही. व्यापार उदिमात राहावे असा मराठी माणसाचा आग्रह नसतो. त्यामुळे बाजारात मराठीचे महत्त्व टिकवणे याची महत्ता मराठी माणसाला जाणवत नाही. आजच्या मराठी भाषा दिनी किंवा एक संकल्प मराठी लोकांनी केला की, घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर सर्व ठिकाणी आम्ही आग्रहाने मराठीच बोलू. तर मुंबईचे वातावरण मराठी व्हायला वेळ लागणार नाही. आज मुंबईचा मराठी टक्का घसरत आहे. या घसरत्या टक्क्याची चिंता राज्यकर्त्यांना नाही. तसेच मराठी नेत्यांनाही नाही. मराठी माणसांचा कैवार घेणा-या ज्या शिवसेनेने फेरीवाल्यांविरुद्ध मोहिमा चालवल्या ती शिवसेना आता फेरीवाल्यांना संरक्षण देते आहे, कारण मतांचे गणित त्यांना कळले आहे. मराठी भाषेसाठी आणि त्याच्या आग्रहासाठी मतांच्या गणितातून पहिल्यांदा बाहेर यावे लागेल. दुसरं असं की, मराठी माणूस व्यापार करायला अजून फारसा धजावत नाही. जी मराठी उपाहारगृहे मोठय़ा दिमाखात होती ती आता लयाला चालली आहेत. मराठी व्यापारपेठ दिवाळीपुरती सजते आणि नंतर कोसळते. मुंबईचे बहुसंख्य व्यवसाय ज्यात ऑटोमोबाईल्स, हॉटेल्स, तयार कपडे, साडय़ांची दुकाने, दागिने हे मराठी माणसांच्या हातात राहिलेले नाहीत. मराठी माणसं ८० टक्के नोक-यांसाठी मोर्चा काढतात. पूर्वी शिवसेनेतर्फे असे मोर्चे निघायचे.. ‘कोणत्याही व्यवस्थापनात मराठी माणसाला ८० टक्के नोक-या द्या..’ अशा घोषणा व्हायच्या. आम्ही ८० टक्के नोक-या मागतो आणि त्या मागायलाही हव्यात आणि मिळायला हव्यात. पण मराठी माणूस ‘व्यापार ८० टक्के आपल्या ताब्यात ठेवू’ असे म्हणत नाहीत. मराठी भाषा दिनी मराठीचा अभिमान बाळगताना मराठी माणसाने मराठी माणसांचे दोषही पाहिले पाहिजेत. आमच्यात दोष खूप आहेत. एखाद्या मराठी माणसाचे कापडाचे दुकान असेल आणि गि-हाईकाने १० ठिकाणी कापडाचे ढीग पाहायला लावले तर मराठी मालक चिडेल. घ्यायचे तर घ्या, असे चिडून सांगेल. तिथे सिंधी, गुजराती असेल तर तो तागेच्या तागे दाखवत राहील. व्यापा-याची खुबी मराठी माणसाला कळली नाही. शिवाय घरातील अंतर आम्ही व्यवहारातही आणतो. मराठी भाषा दिनी मराठी माणसांनी भाषेचा अभिमान बाळगतानासुद्धा आपल्या दोषांचेही चिंतन केले पाहिजे. एकेकाळची ‘हर हर महादेव’ ही युद्धभूमीवरची घोषणा मराठी माणसानेच जेवणाच्या पंगतीत आणून ठेवली. तेव्हा मराठी माणसाला नेमके काय करायचे आहे, हे अजून सूचत नाही.

आजच्या मराठी भाषा दिनी ‘ज्ञानेशाची ही मराठी अमृताशी पैजा जिंकणारी आहेच’, याचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण त्याचबरोबर मराठी भाषेप्रमाणेच एकभाषा सूत्रावर आज जगाच्या स्पर्धेत मराठी माणूस टिकेल काय? याचाही विचार केला पाहिजे. आज जग जवळ आले आहे आणि संगणकीय क्रांतीने अनेक विषयांची दारे स्पर्धेकरिता खुली ठेवली आहेत. या स्पर्धेकरिता टिकायचे असेल तर मराठी माणसाला इथून पुढच्या जगात कोणाच्यातरी शिफारसीवर नोकरी मिळेल किंवा व्यवसायात प्रवेश करता येईल, असे जग आता शिफारशीवर चालत नाही. उद्याच्या प्रगत जगाचा एकच निकष राहणार आहे तो म्हणजे तुमची गुणवत्ता आणि तुमची बुद्धिमत्ता. या कसोटीवर जो टिकेल तो जग जिंकेल. आजच्या जगाची दारे गुणवंत्तांसाठी खुली आहेत. म्हणून मराठी तरुणांना कळकळून सांगायचे आहे की, मराठीचा अभिमान धरताना ‘मी मराठी’, ‘मायमराठी’ हे जरूर म्हणाच. परंतु जगन्मान्य इंग्रजी भाषेच्या प्राविण्याशिवाय आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी तरुण टिकू शिकणार नाही. म्हणून केवळ एका भाषेचे पारंगतता आता पुरेशी नाही. किमान दोन भाषा अतिशय अस्खलितपणे येणे आवश्यक आहे. म्हणून मातृभाषेबरोबरच जगाच्या स्पर्धेतील पर्यायी भाषा म्हणून इंग्रजीचाच स्वीकार करावा लागेल. ज्यांना जर्मन, फ्रेंच, रशियन किंवा चिनी शिकायचे असेल तर अधिक स्वागतार्ह आहे. पण केवळ मराठी भाषेवरच आणि माझ्या गुणवत्तेच्या जोरावर मी पुढे जाईन, इतके हे जग आता मर्यादित राहिलेले नाही.

कवीश्रेष्ठ सुरेश भट यांनी एक छान कविता लिहिली.. कवितेचे शब्द असे आहेत की,

साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला..

मराठीची साय जरूर खायला हवी. कधी पातेल्यात बोट घालून खरवडूनसुद्धा खायला हवी. पण मी मराठीची साय खातो म्हणून कुणाचाही उंबरा झिजवणार नाही, अशा कवी कल्पनेत वावरणारे मागे पडतील. माधव ज्युलियन यांनी इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे.

‘वाघिणीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे’

या वाघिणीच्या दुधावर मराठीची साय पकडली तर उत्तमच. पण सकाळी मराठीची साय खाऊन दिवसा वाघिणीचे दूध पचवायला काही हरकत नाही. ‘साय मराठीची आणि दूध वाघिणी’चे हेच उद्याच्या मराठी तरुणांना त्यांच्या आयुष्यात चांगल्या संधीपर्यंत घेऊन जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज... काही विचार

छत्रपती शिवाजी महाराज... काही विचार

आज शिव-जयंती निम्मित छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकण्यातून, वाचनातून उमजलेले काही विचार लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. 

छत्रपती शिवाजी Vs मुसलमान

छत्रपती शिवाजी Vs मुसलमान हे चित्र निर्माण करण्याचं काम प्रथम इंग्रजांनी केलं त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ होता कारण सबंध भारतवर्षात गोऱ्या सरकारला देशाबाहेर काढण्याची हिम्मत फक्त मराठ्यांमध्ये(आता मराठे म्हणजे फक्त मराठा असा विचार करत असाल तर कृपया इतिहास वाचा जरा. शुद्ध शब्दात सांगायचे म्हणजे मराठी बोलणारे मराठे.) आणि या मराठ्यात एकी झाली तर इंग्रजांच काही खरं नाही. मराठ्यांमध्ये जी उर्जा होती त्याचा मूळ स्रोत शिवराय. गोरयांनी पहिला शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेषठे होते असा प्रचार केला आणि नंतर त्यांनी मराठा आणि ब्राह्मण समाजात तेढ निर्माण केला आणि अजूनही तो कायमच आहे. महाराजांनी केलेलं हे कृत्य म्हणजे साधे बंड नव्हते तर ती क्रांती होती. आपल्या शब्दात सांगायचे तर It was revolution. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर त्याकाळच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने म्हटले होते. "Others in this country are knit together in this country by other causes : they are castes, religious setc, tribes but the Marathas are a nation & from Brahman, Kunabi to Mahar they glory the fact". छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या प्रगतीच्या आड येणारे अडथळे कडून टाकून मार्ग मोकळा केला. त्यांचा उद्देश अफझलखानास मारण्याचा नव्हता, तर प्रगतीच्या मार्गावर आड येणाऱ्या विघ्नाचे निवारण करावयाचा होता. केवळ मुसलमान म्हणून त्याला मारावयाचा हेतू असता तर शिवरायांनी खानाच्या बायकोला दागिने वगेरे देऊन विजापुरास पाठविले नसते. प्रत्येकाने जातीकडे क़िव्हा धर्माकडे न बघता सर्व राष्ट्राकरिता प्रयत्न केला पाहिजे.

लोकमान्य टिळक म्हणाले होते, " छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी एखादा मुसलमान असता तरी त्याचा आम्ही गौरव केला असता." या पुढे जाऊन टिळक असे म्हणतात कि आपण शिवरायांच्या कामगिरीतील प्रेरणा घेतली पाहिजे. या प्रेरणेने आजच्या काळात न जाणो एखादा शिवाजीसारखा लोक-गुणी इतर प्रांतात जन्माला येईल. कदाचित धर्माने तो मुसलमान ही असेल. शिवराय मुसलमान धर्माचे शत्रू नव्हते. मुस्लिमांच्या धर्म भावना न दुखावता ते मोघल निजाम आदिलशहाशी लढले. हा लढा धर्माधर्माचा नव्हता. जुलूम आणि स्वातंत्र्य यांच्यातला हा झगडा होता. शिवरायांच्या चरित्राचे हे आकलन केल्यास आजच्या स्थितीत मुस्लिमांना देखील शिवजयंती उत्सवात भाग घेण्याची दिक्कत वाटणार नाही.

आज आपण जातीपातीचे राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सुद्धा आपली मजल गेली. अफझलखानाच्या वध म्हणजे जणू काही एका हिंदूने एका मुसलमानाची निर्घुण हत्या केली असं समजून काही लोकांनी पोस्टर्स लावले आणि शिवरायांबद्दलचा गैरसमज पसरवण्यास अजून मदत केली. दारू ढोसायची, डिजिटल डॉल्बीवर आपल्या बापाचा रस्ता समजून नाचायचं. हे असले कसले शिवभक्त!!! अरे लाज वाटत असेल शिवबांना सुद्धा तुमच्याकडे पाहून. सह्याद्री प्रतिष्ठान आणि कितीतरी संघटना ज्यांनी दुर्गसवर्धनेच वसा हाती घेतला आणि कितीतरी किल्ल्यांना जीवदान दिलं. काही संघटना रक्तदान वगेरे शिबीर राबवतात. असं काहीतरी करा ना राव कशाला पाहिजे तू हिंदू मी मुस्लिम वाद!!



आणि रायगडचा राजा खऱ्या रुपात घरोघरी गेला.. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधी लेख प्रसिद्ध करून श्री वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म पेण येथे १८९३ साली झाला. रेल्वेच्या ऑडीट खात्यात काम करत असताना ते भारत इतिहास संशोधन मंडळात काम करू लागले. श्री वा. सी. बेन्द्रेना लंडनला जाऊन इतिहासाची साधने तपासण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी परिस केलं. त्यापूर्वी इब्राहीम खान नावाच्या परकीयाचे चित्र शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून इतिहासांच्या पुस्तकात छापले होते. १९१९ मध्ये बेन्द्रेना अभ्यास करत असताना valentine या डच गव्हर्नरने लिहिलेलं एक पत्र मिळालं. इ.स. १६६३-१६६४ सुरतेच्या डच वखारीत तो गव्हर्नर होता. त्याचा आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढलेले चित्र श्री बेंद्रे यांना मिळाले आणि तेव्हापासून रायगडचा राजा खऱ्या रुपात घरोघरी गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधी लेख प्रसिद्ध करून श्री वा. सी. बेन्द्रेनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली. आज आपल्यापैकी किती जणांना हे माहित आहे. चला तर मग आज शिवजयंती निम्मित वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे सुद्धा स्मरण करूया. इतिहास हा निव्वळ विषय नसून त्यातून खूप नवीन काही शिकून आपल्या रोजच्या जीवनात त्या implement करून आलेल्या संकटांवर मत करून जे हवं आहे ते मिळवणं. चला आवरतं घेतो आता लिहायला बसलं कि खूप लिहू शकतो.