आज मराठी भाषा दिन. खरं तर मराठी बोलणा-या प्रत्येकाचा, मग तो महाराष्ट्रात राहो, भारतात राहो, किंवा जगात कुठेही राहो. मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. हा रोजचाच दिवस मराठीचा असला पाहिजे. मातृभाषा ही मातेएवढीच पवित्र आणि वंदनीय आहे. त्यामुळे मातृभाषा दिन एका दिवसापुरता न साजरा करता ३६५ दिवस साजरा व्हावा.
त्याचे स्वरूप उत्सवासारखे नसावे. पण व्यवहारात या भाषेचे महत्त्व किती आहे इतके प्रत्येकाला जाणवावे. मुंबईमध्ये राहणा-या मराठी माणसाने एक खुणगाठ बांधावी की, ही मायमराठी रस्त्यावर उतरल्यावरसुद्धा आपण बोलतो का? रिक्षा- टॅक्सीत बसल्यानंतर रिक्षा-टॅक्सीवाले हिंदी भाषिक असतील तर मराठी भाषिक हिंदीत बोलायला लागतो. त्या रिक्षा-टॅक्सीवाल्याला मराठी बोलायचा आग्रह धरत नाही. मुंबईच्या रस्त्यावर मराठी भाषा खुरटली. याचे कारण व्यवहारात आम्हाला मराठीचे महत्त्व मुंबईच्या बाजारातही असायला पाहिजे, हे जाणवत नाही. थोडा अधिक तपशिलात विचार केला तर त्याचे मुख्य कारण मराठी माणूस मूलत: व्यापारी प्रवृत्तीचा, व्यवसाय प्रवृत्तीचा नाही. व्यापार उदिमात राहावे असा मराठी माणसाचा आग्रह नसतो. त्यामुळे बाजारात मराठीचे महत्त्व टिकवणे याची महत्ता मराठी माणसाला जाणवत नाही. आजच्या मराठी भाषा दिनी किंवा एक संकल्प मराठी लोकांनी केला की, घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर सर्व ठिकाणी आम्ही आग्रहाने मराठीच बोलू. तर मुंबईचे वातावरण मराठी व्हायला वेळ लागणार नाही. आज मुंबईचा मराठी टक्का घसरत आहे. या घसरत्या टक्क्याची चिंता राज्यकर्त्यांना नाही. तसेच मराठी नेत्यांनाही नाही. मराठी माणसांचा कैवार घेणा-या ज्या शिवसेनेने फेरीवाल्यांविरुद्ध मोहिमा चालवल्या ती शिवसेना आता फेरीवाल्यांना संरक्षण देते आहे, कारण मतांचे गणित त्यांना कळले आहे. मराठी भाषेसाठी आणि त्याच्या आग्रहासाठी मतांच्या गणितातून पहिल्यांदा बाहेर यावे लागेल. दुसरं असं की, मराठी माणूस व्यापार करायला अजून फारसा धजावत नाही. जी मराठी उपाहारगृहे मोठय़ा दिमाखात होती ती आता लयाला चालली आहेत. मराठी व्यापारपेठ दिवाळीपुरती सजते आणि नंतर कोसळते. मुंबईचे बहुसंख्य व्यवसाय ज्यात ऑटोमोबाईल्स, हॉटेल्स, तयार कपडे, साडय़ांची दुकाने, दागिने हे मराठी माणसांच्या हातात राहिलेले नाहीत. मराठी माणसं ८० टक्के नोक-यांसाठी मोर्चा काढतात. पूर्वी शिवसेनेतर्फे असे मोर्चे निघायचे.. ‘कोणत्याही व्यवस्थापनात मराठी माणसाला ८० टक्के नोक-या द्या..’ अशा घोषणा व्हायच्या. आम्ही ८० टक्के नोक-या मागतो आणि त्या मागायलाही हव्यात आणि मिळायला हव्यात. पण मराठी माणूस ‘व्यापार ८० टक्के आपल्या ताब्यात ठेवू’ असे म्हणत नाहीत. मराठी भाषा दिनी मराठीचा अभिमान बाळगताना मराठी माणसाने मराठी माणसांचे दोषही पाहिले पाहिजेत. आमच्यात दोष खूप आहेत. एखाद्या मराठी माणसाचे कापडाचे दुकान असेल आणि गि-हाईकाने १० ठिकाणी कापडाचे ढीग पाहायला लावले तर मराठी मालक चिडेल. घ्यायचे तर घ्या, असे चिडून सांगेल. तिथे सिंधी, गुजराती असेल तर तो तागेच्या तागे दाखवत राहील. व्यापा-याची खुबी मराठी माणसाला कळली नाही. शिवाय घरातील अंतर आम्ही व्यवहारातही आणतो. मराठी भाषा दिनी मराठी माणसांनी भाषेचा अभिमान बाळगतानासुद्धा आपल्या दोषांचेही चिंतन केले पाहिजे. एकेकाळची ‘हर हर महादेव’ ही युद्धभूमीवरची घोषणा मराठी माणसानेच जेवणाच्या पंगतीत आणून ठेवली. तेव्हा मराठी माणसाला नेमके काय करायचे आहे, हे अजून सूचत नाही.
आजच्या मराठी भाषा दिनी ‘ज्ञानेशाची ही मराठी अमृताशी पैजा जिंकणारी आहेच’, याचा अभिमान वाटलाच पाहिजे. पण त्याचबरोबर मराठी भाषेप्रमाणेच एकभाषा सूत्रावर आज जगाच्या स्पर्धेत मराठी माणूस टिकेल काय? याचाही विचार केला पाहिजे. आज जग जवळ आले आहे आणि संगणकीय क्रांतीने अनेक विषयांची दारे स्पर्धेकरिता खुली ठेवली आहेत. या स्पर्धेकरिता टिकायचे असेल तर मराठी माणसाला इथून पुढच्या जगात कोणाच्यातरी शिफारसीवर नोकरी मिळेल किंवा व्यवसायात प्रवेश करता येईल, असे जग आता शिफारशीवर चालत नाही. उद्याच्या प्रगत जगाचा एकच निकष राहणार आहे तो म्हणजे तुमची गुणवत्ता आणि तुमची बुद्धिमत्ता. या कसोटीवर जो टिकेल तो जग जिंकेल. आजच्या जगाची दारे गुणवंत्तांसाठी खुली आहेत. म्हणून मराठी तरुणांना कळकळून सांगायचे आहे की, मराठीचा अभिमान धरताना ‘मी मराठी’, ‘मायमराठी’ हे जरूर म्हणाच. परंतु जगन्मान्य इंग्रजी भाषेच्या प्राविण्याशिवाय आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी तरुण टिकू शिकणार नाही. म्हणून केवळ एका भाषेचे पारंगतता आता पुरेशी नाही. किमान दोन भाषा अतिशय अस्खलितपणे येणे आवश्यक आहे. म्हणून मातृभाषेबरोबरच जगाच्या स्पर्धेतील पर्यायी भाषा म्हणून इंग्रजीचाच स्वीकार करावा लागेल. ज्यांना जर्मन, फ्रेंच, रशियन किंवा चिनी शिकायचे असेल तर अधिक स्वागतार्ह आहे. पण केवळ मराठी भाषेवरच आणि माझ्या गुणवत्तेच्या जोरावर मी पुढे जाईन, इतके हे जग आता मर्यादित राहिलेले नाही.
कवीश्रेष्ठ सुरेश भट यांनी एक छान कविता लिहिली.. कवितेचे शब्द असे आहेत की,
साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला..
मराठीची साय जरूर खायला हवी. कधी पातेल्यात बोट घालून खरवडूनसुद्धा खायला हवी. पण मी मराठीची साय खातो म्हणून कुणाचाही उंबरा झिजवणार नाही, अशा कवी कल्पनेत वावरणारे मागे पडतील. माधव ज्युलियन यांनी इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे.
‘वाघिणीचे दूध प्यायला वाघ बच्चे फाकडे’
या वाघिणीच्या दुधावर मराठीची साय पकडली तर उत्तमच. पण सकाळी मराठीची साय खाऊन दिवसा वाघिणीचे दूध पचवायला काही हरकत नाही. ‘साय मराठीची आणि दूध वाघिणी’चे हेच उद्याच्या मराठी तरुणांना त्यांच्या आयुष्यात चांगल्या संधीपर्यंत घेऊन जाणार आहे.