Tuesday, 21 December 2021

न समजणाऱ्या लोकांच्या गोष्टी...



मी ज्या गोष्टी सांगतोय त्या मला काय तुम्हाला पण नाही समजत असणार :-) 

🏵एकटे आई-बाबा मेहनत करून आपल्या ३-४ मुलांना सहज सांभाळून घेतात. परंतु मोठे झाल्यावर त्या ३-४ मुलांकडून आपले वृद्ध आई-बाबा सांभाळले जात नाहीत.

🏵गल्लीतल्या बायका दुपारच्या वेळेला एकत्र जमून तासोनसात एकेमेकांना बद्दल चुगल्या लावतात, चर्चा करतात, दुसऱ्या गल्लीतल्या बायकांना नाव ठेवतात. आणि शेवटी हे सांगून उठतात की “मरू देणा, आपलयाला काय करायचं आहे??”

🏵सनी लिओनी काय करते कोण आहे ती हे सगळ्यांना माहित आहे. तिला बॉलीवूड मधली सध्याची अतिशय प्रियं आणि जास्त मानधन घेणारी अभिनेत्रीचा दर्जा दिलाय. एकीकडे एक विधवा किंवा जिच्यावर बलात्कार झालाय अशा मुलीला समाजात एक “स्त्री” म्हणून सुद्धा सम्मान नाही दिला जात.

🏵इकडे, सलमान खान काल रात्री ह्या नटीसोबत पार्टीत दिसला, सई ताम्हणकर हिची नवीन केशरचना ही आहे हे पहिल्या पानावर वृत्तपत्रात छापून येते. महाराष्ट्रात एकूण किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ह्याची चर्चा मधल्या पानामध्ये असते ती पण ५ ओळीची फक्त.

🏵सिगरेट पिणारे एकेमेकांमध्ये स्पर्धा लावतात अरे मी एका दिवसाला १५ ओढतो, मी १८ ओढतो. मी एवढा लांब धूर सोडतो, मी एवढा वेळ धूर पकडून ठेवतो. ह्यात स्पर्धेसारख काय आहे?

🏵लोकांना शासनाची बस सेवा नकोय, शासनाने बांधलेले शौचालय नकोय, शासनाचे विद्यालय नकोय, शासनाचे वसतिगृह नकोय परंतु शासनाची नोकरी हवी आहे.

🏵स्कूटीला ब्रेंक दिलेला असतो ना मग मुली पायानेच का गाडी थांबवतात? मी तर खुपदा पाहिले आहे.

🏵मोबाईलचे रिचार्ज करतात ३९९/-, २९९/-, ४९९/- चे. परंतु बाजारात एखाद्या गरीब शेतकऱ्याणे बटाटे १५ रूपये किलो एवजी १७ रुपये किलो दिले तर त्या २ रुपयासाठी भांडतात.
🏵तलाठ्याकडे कडे काम घेऊन जा तो म्हणतो उद्या या. बँकेत एखादे काम निघाले की ते म्हणतात तिकडच्या काउंटरला जा, तिकडे गेले तर ते म्हणतात उद्या या. काम जास्त काही ३-४ तासाचे नसते बर, खरच १०-१५ मिनिटे लागणार असतात पण ते करून देत नाहीत.
🏵स्वतःच्या पक्षाचा प्रचार करतांना “आम्ही एवढे दिवस काय केलय” हे सांगण्यापेक्षा “एवढे दिवस त्या समोरच्या पार्टीने काय नाही केलय” ह्याचे जास्त पोवाडे का गातात?
🏵“कृपया इथे थुंकू नका” किंवा “कृपया इथे मूत्रविसर्जन करू नका” असे लिहेलेले असते त्यालाच लोक “तेच तेच” करून पुसून टाकतात.
🏵प्रत्येकाकडे घडयाळ असतो, नसला तरी मोबाईल असतोच वेळ दाखवायला, आणि प्रत्येक जण घाईमध्ये असतो. तरी कोणीच हव्या त्या ठिकाणी वेळेवर का पोहोचत नाही?
🏵whatsappp वर काही जण going to औरंगाबाद, feeling sad, I am sorry, maaf kar do na baba, enjoying at nashik असे स्टेटस का ठेवतात?
🏵मांसाहार करणारे पण गजब हा. काही जण फक्त रस्सा खातात, काही जण फक्त मांस, काही जण शनिवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी खातात, काही जण फक्त रविवारी खातात, काही जण नेहमी खातात पण बायकोला माहिती नाही. हे मला खरच समजत नाही?
धार्मिक स्थळ, मंदिरे, ऐतिहासिक जागेला भेट देणारे सगळे जण तिथे जाऊन त्या मंदिरांची महती जाणून न घेता, त्यांची माहिती जाणून न घेता… तिथे जाऊन १००० फोटो कडून मस्त खाल्लेला कचरा तिथेच कुठेतरी फेकून आपल्या घरी परत चालले जातात.
🏵जी भली मोठी रांग मंदिराच्या बाहेर प्रार्थनेसाठी लागलेली असते तेवढीच मोठी रांग वाचनालयाबाहेर का लागतं नाही? वाचनालय रिकामे असते.
🏵काही प्रेमी युगुल ५-६ वर्ष सोबत असतात, काही १०-११ वर्ष नात्यात असतात आणि तरी त्यांचे ब्रेअकप होतात. कस काय यार?
🏵काही तीर्थक्षेत्रात ह्या मार्गाने दर्शनाचे २०० रुपये, मागच्या मार्गाने दर्शनाचे ६०० रुपये आणि सरळ गाभाऱ्यात प्रवेशाचे १५०० रुपये का आकारले जातात.
१५०० रुपयात देव प्रकट होत असले का?
🏵गणेशोत्सवच्या वेळी आमच्या मंडळाचा गणपती उंच, आमचा गणपती जास्त महाग, आमच्याकडे आरतीला जास्त गर्दी अशी मंडळांमध्ये स्पर्धा का लागलेली असते.
 देव आमचा-तुमचा असतो का? देव देखणा-कुरूप असतो का?
🏵आई-बाबा ह्यांच्यावर लिहल्या जाणाऱ्या कवितांचे गुणोत्तर ५:१ आहे. ५ आईवरील कवितांमागे १ कविता बाबांवर असते. बाबांचे गुणगान खूप कमी जण का गातात? आई सगळीकडे दिसते, बाबा तोडके मोडके दिसतात.
मानसशास्त्र  * वर्तन  * behavior *

Wednesday, 8 December 2021

जुने मित्र आता हरवलेत

जुने मित्र आता हरवलेत
 कोणी खुप busy झाले!!
 तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 वेळ पाहुन आता भेटु लागले
 भेटुनही काही मित्र आता
 घड्याळात पाहु लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी मोजकेच बोलु लागलेत!!
 तर कोणी काय बोलावं ते म्हणु लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी success बद्दल बोलु लागलेत!!
 तर कोणी स्वतःचच गुणगान गाऊ लागलेत!!
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 कोणी माझ तुझ करु लागलेत
 तर कोणी उगाच तिरस्कार करु लागलेत
 कधी जुन्या भांडणाचे आता
 उगाच राग धरू लागलेत
 खरंच जुने मित्र आता हरवलेत!!

 सगळं share करणारे मित्र आता
 उगाच खोट बोलु लागलेत
 मित्रा सोबत दुखः वाटणारे
 उगाच खोटी प्रतिष्ठा जपु लागलेत!!

 खरंच जुने मित्र आता पुन्हा
 आठवणीत येऊ लागलेत!!
 एक कप चहासाठी
 पुन्हा कट्टयावर भेटु लागलेत!!
 वेळ न पहाता अवेळी येऊ लागलेत!!
 मनातल्या जुन्या आठवणी
 पुन्हा share करु लागलेत!!

जे आपल्यासाठी योग्य आहे ते देव देतो फक्त काही काळ वाट पहावी लागते.

देव आपल्या मुलांना तेच देतो जे मुलांसाठी योग्य असते

एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की देव सफरचंद वाटायला येत आहेत.सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती.एक लहान मुलगी खूप उत्सुक होती, कारन ती पहिल्यादा देवाला बघणार होती.ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात खूप खूश होती.देव रांगेतल्या लोकांना सफरचंद वाटू लागले,तीचा क्रमांक आला,देवाने तिला मोठं आणि लाल सफरचंद दिलं ती रांगेतून बाहेर पडताच तीच सफरचंद हातातून निसटून ते चिखलात पडलं.मुलगी उदास झाली.
    आता तिला दुसऱ्यांदा रांगेत राहावं लागणार दुसरी रांग पहिल्यापेक्षा लांब होती, परंतु दुसरा कोणताच मार्ग नव्हता.सर्व लोक प्रामाणिकपणे रांग लावून प्रसाद घेऊन जात होते.शेवटी ती मुलगी पुन्हा रांगेत लागली आणि तिचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागली.अर्ध्या रांगेतच सफरचंद संपत आले.मुलगी उदास झाली.तिला वाटलं आपण येईपर्यंत सफरचंद संपतील परंतु तिला माहीत नव्हते की देवाचं भांडार कधी रिकामे होत नाही.
     तिचा क्रमांक आला तोपर्यंत आणखी नवे सफरचंद आले.देवाने तिच्या मनातलं ओळखलं ते तिला सफरचंद देत म्हणाले की पहिल्यादा जे सफरचंद दिलं होतं ते एका बाजूने सडलेले होत तुझ्यासाठी ते योग्य नव्हते म्हणून मीच ते तुझ्या हातातून पाडलं होत.दुसऱ्यांदा तुला लांब रांगेत यासाठी उभं राहू दिलं कारण सफरचंद तेव्हा झाडाला होते ते यायला वेळ होता.म्हणून तुला जास्त वेळ वाट पाहावी लागली हे सफरचंद जास्त लाल सुंदर आणि तुझ्यासाठी उपयुक्त आहे.देवाच बोलणं ऐकून मुलगी आनंदी झाली.
    याचप्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी वाट पाहावी लागत असेलतर देवाची इच्छा समजून त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो,त्याचप्रमाणे देवसुद्धा त्याच्या मुलांना तेच देतो जे त्याच्यासाठी चांगलं आहे .

Saturday, 4 September 2021

एक कप कटिंग चहा

*एक कटिंग असाही...* 
(हृदयस्पर्शी व्याख्या "लंगोटी यार" ची)

सकाळी सकाळी मला फोन आला.
"नमस्कार. आपण भास्कर आपटे बोलताय का?"
"नमस्कार, मी भास्कर आपटे बोलतोय. आपण कोण बोलताय?"

"काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. "
" कोणाचा मुलगा?"
" सुरेश कामतांचा. बाबा म्हणाले की तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. "
" हो. होतो आम्ही जिगरी दोस्त. पण आता त्याचे काय. आमची मैत्री मोडून पण चाळीस वर्षे झाली. आता आम्ही कित्येक वर्ष भेटलेलो सुद्धा नाही. "

" हो. बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे. तुम्हाला कॉलेजचे जय वीरू म्हणायचे ना? "
सुरेशाच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे पण मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये पहावा तसे माझे बालपण माझ्या नजरेसमोर येत होते.
मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच चाळीत जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली मग कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघे एकत्रच असायचो. एकमेकांशिवाय आमचे पान हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्यापुरते. तासादोन तासाच्यावर आमचे भांडण टिकायचेच नाही.
आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असे आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघे एकत्रच माझ्या आणि त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो  सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत, अळूच्या फतफद्यासकट सगळे पदार्थ  तो आवडीने खायचा.
कॉलेजातही आमची मैत्री फेमस होती. आम्ही कॅंटीनमधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा हा आमच्या दोघांचाही वीक पॉईंट..दिवसभरात दोघांचा मिळून दहाबारा कप चहा होत असे. गप्पा मारताना, अगदी मुलींकडे चोरून बघताना, अभ्यास करताना. आम्हाला चहा हवाच असायचा. आमच्या चहा पिण्याची थट्टा व्हायची. आम्ही दोघे नेहमी म्हणायचो आमची चहाची सवय आणि आमची मैत्री कधीच तुटणार नाही. 

सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे या दोघांची. खरच कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला?

 कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांत आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती. जो त्यात यशस्वी होईल त्याला दोन हजार रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते.
आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती.
आम्ही आमच्याच विश्वात मश्गुल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळविले. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पहायला लागलो. आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. दरवर्षी मी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा किंवा तिसरा असायचा. यावेळी पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला आणि सुरेशचा पहिला..
माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितले की सुरेशने कॉपी करुन पहिला नंबर मिळवला आणि मुलींवर पहिल्या नंबरचे इंप्रेशन मारत फिरतोय.
तेवढ्यात सुरेश व आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅंटीनमधे आले. तो बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊनसुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय  झाले होते कोणास ठाऊक. मी त्याला वाट्टेल ते बोललो. त्या मुलीवरूनही त्याला बोलायला लागलो. तो सुरूवातीला शांत होता पण नंतर त्याचा ही संयम संपला. आम्ही खूप भांडलो. एकमेकांची उणीदुणी काढली. आणि पुन्हा एकमेकांचे तोंडही पहायचे नाही असे मनाशी पक्के करूनच घरी आलो. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या मित्रांनी पैज लावली त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणायचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. प्रेस्टीज इश्यू केला. पुढे मला नोकरी मिळाली. मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमची जुनी चाळ पाडली. सगळी पांगापांग झाली.
आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली. सुरेश तिथे असेल म्हणून मी जायचे टाळले. एकदा वाटले की आपण फोन करून सुरेशशी बोलावे. रियुनियनच्या निमित्ताने का होईना पुन्हा भेटावे. पण माझा इगो आड आला. इतकी वर्षे गेली तरी त्यानेही स्वतःहून कधीच फोन केला नाही. तो ही कॉलेजच्या व्हॉटसॲप ग्रुप पासून दूरच राहिला. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन...
"काका ऐकताय ना? मला तुम्हाला भेटायचे आहे. आजच्या आजच. मी दुपारी येऊ का?" माझी तंद्री भंग पावली.
"का? तू का भेटणार आहेस. तुझ्या बाबांनी का फोन नाही केला. त्याला अजूनही माझ्याशी बोलायचे नाहीच ना? तू तरी कशाला येतोयस मग?"

"काका, प्लीज. मी आल्यावर सविस्तर बोलू. मला प्लीज थोडा वेळ तरी भेटा."

 मला त्याच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. मी पण फारसे आढेवेढे न घेता त्याला भेटायला तयार झालो.
त्याला माझ्या घराचा पत्ता मेसेज केला. अर्ध्या तासात येतो असा त्याने उलटा मेसेज केला.

मी त्याची उत्सुकतेने वाट पहात होतो. अक्षरशः वीस मिनिटात माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझ्या समोर जणू तरूणपणीचा सुरेशच उभा आहे असा भास मला झाला. सुरेशच्या मुलाला मी पहाताक्षणी ओळखले.
तो घरात येऊन बसला. गौतमीने माझ्या सुनेने आम्हाला कॉफी आणून दिली.
"काका तुम्ही चक्क कॉफी पिताय?" सुरेशच्या मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. "बाबा म्हणायचे की तुम्ही दोघे कॉफी पिणाऱ्यांची थट्टा करायचा आणि आपण जन्मात कधी चहा सोडून कॉफी पिणार नाही म्हणायचात."
मी पुन्हा जुन्या आठवणीत रमणार होतो पण तेवढ्यात हा सुरेशचा मुलगा सुरेशचा उल्लेख भूतकाळात करतोय हे मला चांगलेच खटकले. मी न रहावून त्याला विचारलेच." तुझे बाबा का नाही आले, अजूनही राग गेला नाही का? "
" तेच सांगायला आलोय काका.. मागच्या आठवड्यात बाबा गेले. "

" काय!!" 
मला खूप मोठ्ठा धक्का बसला.
"असा कसा गेला. मला न भेटताच. शक्यच नाही. तू मला फसवतोयस. होय ना."
"नाही काका. मी या बाबतीत कसा फसवीन? बाबांना जायच्या आधी तुम्हाला भेटायची आणि तुमच्याबरोबर चहा प्यायची खूप इच्छा होती पण तितका वेळच मिळाला नाही. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला तोच खूप मॅसिव्ह होता. अर्ध्या तासात सारा कारभार आटोपला. काका उद्या बाबांचे दहावे आहे. तुम्ही याल? तुम्ही  आला नाहीत. तिथे येऊन चहा प्यायला नाहीत तर बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. काका याल ना? "

मी पुरता कोसळलो होतो. सुन्न झालो होतो. गौतमीने मला सावरले. तिनेच सुरेशच्या मुलाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि मला तिथे घेऊन ती स्वतः किवा माझा मुलगा येईल असे सांगितले.
त्या दिवशी मी काय केले, काय खाल्ले याची मला शुद्धच नव्हती. सतत सुरेश डोळ्यासमोर दिसत होता. मी कितीही मनापासून त्याची माफी मागितली तरी त्याचा आता काहीही फायदा होणार नाही हे सत्य पचवणे मला अशक्य होत होते.
दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन माझा मुलगा माझ्याबरोबर सुरेशकडे आला. सुरेशच्या बायकोला, गिरिजावहिनींना मी पहिल्यांदाच भेटलो. त्यांना देखील मी अगदी ओळखीचा वाटत होतो. माझ्याबद्दल सुरेश सतत भरभरून बोलायचा.
थोड्या वेळाने आम्ही गच्चीत गेलो. तिथे सुरेशची सून दोन चहाचे कप घेऊन आली. एक कप माझ्या हातात दिला आणि एक कठड्यावर माझ्यापासून थोडा लांब ठेवला. मी तिला एक कप चहा परत न्यायला सांगितले. पूर्वी प्यायचो तसा अर्धा अर्धा चहा आता आम्ही पिणार होतो. माझ्या चहातला अर्धा चहा एका बशीत ओतून मी गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि मी मनातल्या मनात सुरेशशी बोलू लागलो. कित्येक वर्षांची कसर भरुन काढू बघत होतो.
"सुरेशा, बघ मी आलोय तुला भेटायला. बरोब्बर एकोणचाळीस वर्षे सहा महिने बावीस दिवस झाले तुला भेटलो नाही. इतक्या वर्षात तुला माझ्याशी बोलावेसे वाटले नाही ना? माझ्यावर इतका रागावलास. मला मान्य आहे चूक माझीच होती. पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला माहिती आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी चहा प्यायलो नाही. तुझ्याशिवाय चहा प्यायची कल्पनाच करवत नाही. आज मात्र तुझ्या सुनेच्या हातचा चहा आपण दोघे मिळून पिणार आहोत. . मला माहितीये तू आहेस इथेच कुठेतरी आसपास. तुझे शरीर इथे नसले तरी तुझा आत्मा इथेच आहे. तू ऐकतोयस ना? चल आज आपण पूर्वीसारखाच कटिंग पिऊया. "
असे म्हणून मी चहाचा कप तोंडाला लावला आणि भर्रकन एक कावळा आला आणि त्याने कठड्यावर ठेवलेल्या चहात चोच बुडवली.

*...@समिधा ययाती गांधी*

⚡⚡
मित्रांनो, तुमच्या बाबत अशीच एखादी 'इगोची आडी' निर्माण झालेली असेल तर वेळीच स्वतःला सावरा...

🙏🙏🙏
🌸🌷🌸

Thursday, 6 May 2021

श्रद्धांजली RIP असे म्हणू नये

*RIP*
काय  आहे हे RIP?
Rest in peace
चा खरा अर्थ जाणून घ्या.
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय 'भयानक' लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ? जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?

 कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका. ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका. 

"जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे." हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ? 

छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबणा करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमीनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत "प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे". मात्र आपण हे काय करतो आहोत ?

REST IN PEACE म्हणजे 'शांतपणे पडून रहा.'  हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल.. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची... गाडलेल्या जागेतून सुटका नाही असे त्यांचा धर्म सांगतो. 

फरक नीट समजून घ्या. हिंदूधर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत. जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात. पुनर्जन्मासाठी. हिंदू त्याला RIP कसे म्हणतील? कारण आत्मा सदगतीस गेला असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. पुढला जन्म प्रवास त्याचा नीट होवो असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत... मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढला जन्म घ्यावा म्हणून. पण इतर धर्म जे 'गाडतात' ते मृतात्माला 'जमीनीत शांत पडून रहा' सांगतात. कयामतपर्यंत तुझी सुटका नाही सांगतात. 

*हिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे जे 'मृत्यू' संदर्भात आहे. ते वाचाल तर RIP म्हणायची हिंमत करणार नाही हिंदू.*

हिंदूने 'भावपूर्ण श्रध्दांजली' म्हणावे. देव मृतात्म्यास सदगती देवो म्हणावे. म्हणजे .. ही जी व्यक्ती वारली आहे ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो. एवढेच कशाला ? एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म मरणाचा; पुनर्जन्माचा फेरा न देता 'मोक्ष' द्यावा अशीही प्रार्थना करता येते.
 
 RIP लिहीणे ही आपल्या स्वधर्मीय मृताची 'विटंबना' आहे हे लक्षात घ्या. सावध व्हा. सावध करा. आणि हिंदू माणसाच्या मरणावर RIP लिहायला 'विरोध' करा. *कृपया मेलेल्या हिंदू माणसाला त्याच्या मृत्यूनंतर RIP लिहून, बोलून 'बाटवू' नका. ही हात जोडून कळकळीची विनंती...*