पिढीतील अंतर
Updated Apr 23, 2010, 12.00AM IST
- गंगाधर पानतावणे
पिढी हा केवढा सन्मानाचा शब्द! आमची पिढी अमूक, आमची पिढी तमूक असे गौरवाचे उद्गार व्यक्त होतात. या निमित्ताने पूर्वजांचं स्मरण होतं. क्वचित कधी आपल्या अस्तित्वाचं नातंही पूर्वपिढ्यांशी जोडलं जातं. पिढी म्हटलं की, विशिष्ट वर्षांची गणना. साधारणत: तीसएक वर्षांची एक पिढी आणि त्यानंतर दुसरी पिढी. हे वयच असं प्रौढतेचं. पिढ्यापिढ्यातील अंतर वेगळाल्या कारणांनी मापलं जातं. विचारसरणी, दृष्टिकोण, जगण्याची शैली, मूल्यात्मकता या बाबी वेगळाल्या पिढ्यांमध्ये वेगळाल्या असतात. त्यात समानता असतेच असं नाही. किंबहुना भिन्नताच अधिक. वृद्ध-वयस्कांची जीवनधारणा तरुणांच्यासारखी नसतेच मुळी. वयातील अंतराचाही हा परिणाम असावा. अंतरामुळे कुटुंबात अपसमज आणि मतभिन्नता संभवते.
वयस्कांची जगण्याची रीतच निराळी. त्यांचे परंपरेशी आंतरिक नाते असते. म्हणून तरुणांच्या जगण्याशी त्यांची नाळ जुळत नाही. प्रत्येकाच्या आशाआकांक्षाही वेगळ्या. वयस्कांचे पूर्वानुभव आणि नव्या पिढीचे अनुभव यात कमालीचे अंतर असते. 'आम्ही चार पावसाळे अधिक पाहिले' ही उक्ती तरुणाईचा तेजोभंग करण्यासाठी नसते, तर तो खडतर जीवनानुभव असतो, पण अनेक तरुणांना ती आत्मप्रौढी वाटते आणि वयस्क माणसं आम्हाला नाउमेद करतात; आमच्या मुक्ततेला बांध घालतात अशी त्यांची धारणा होते.
हे खरं आहे की, अनेक वृद्ध-वयस्कांना आधुनिकतेत रमता येत नाही. त्यांना आपल्या भूतकाळाचे पुन: पुन्हा स्मरण होते. आपला भूतकाळच त्यांना आदर्श वाटतो. आधुनिकतेचा-नवतेचा स्वीकार करायला त्यांची मानसिकता अनुज्ञा देत नाही आणि मग तरुणांच्या आधुनिकतेला ते प्रतिसाद देत नाहीत. उलट मनात एक अढी निर्माण होते. नव्या पिढीने आपल्या पूर्वजांच्या प्रथा आणि परंपरा ठोकरून देता कामा नयेत. त्यांच्याशी समायोजन करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु पिढीच्या अंतरामुळे त्यांना जाणीवच नसते की, पुष्कळ परंपरा आणि प्रथा निरुपदवी असतात. हानिकारक नसतात. पण उपयुक्त मात्र असतात. हे जसे तरुण पिढीच्या संदर्भात म्हणता येईल, तसेच वयस्क पिढीच्याही संदर्भात म्हणता येईल की, त्यांच्या हे लक्षातच नसते की, आपण तारुण्यात असताना आपल्या पूर्वपिढीने अशाच अपेक्षा बाळगल्या होत्या. असा संघर्ष कुटुंबातसुद्धा उद्भवतो. पण वयस्क-वृद्धांची विचारसरणी विध्वंसक असते असे म्हणता येईल का? त्यांच्या अपेक्षा स्फोटक असतात असेही नाही म्हणता येत! पण काळ - आणि काळाचे अंतर हेच त्याचे उत्तर आहे. प्रत्येक पिढी आपली अस्तित्वधारणा जपत असते. मूल्यस्वीकाराची समस्या पिढीतील अंतर कमी करू शकते असे म्हणता येईलच. मात्र मूल्यांची लादणूक अविचार आणि अंधश्ाद्धेला रुजवित राहतात, हे नाही विसरता येत!
कुटुंबातील कर्मठ पालक आणि नव्याचे स्वागत करणारे यातील सामंजस्य आणि संवाद कसा निर्माण होणार? मतांचे आग्रह संघर्षाचं पोषण करतात. म्हणून वृद्ध-वयस्कांनीच नव्या पिढीच्या मानसिकतेला टोकाचे शस्त्र न परजताही सौहार्द निर्माण करता येईल. सुसंवाद आणि सामंजस्य पिढीतील अंतर कमी करू शकतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत हीच मूल्ये उपयुक्त ठरू शकतील. वयस्कांना नव्या पिढीतील तरुणांना समजून घेण्यासाठी क्षमता संपादन केली पाहिजे आणि तरुणांनी आपण कायम तरुण राहणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. 'कृतांत कटकामल ध्वजा जरा दिसो लागली', ही मोरोपंतांची उक्ती लक्षात ठेवायलाच हवी.
पिढीतील अंतर म्हणजे एक नाट्यच; ज्याला सलग नि सरळसोट कथानक नाही. उलट गुंतागुंतच अधिक. पाश्चिमात्य देशात अलीकडे मान्यच केले जात आहे की, सामाजिक संवादाच्या अभावामुळे पिढीतील अंतर वाढत चालले आहे. परिणामस्वरूप वृद्ध-वयस्क, नव्या पिढीतील तरुणांना ओझे वाटत आहेत. एवढेच नाही तर परस्पर नातेसंबंध आणि अनुबंध नष्ट होऊ लागले आहेत. भविष्य चिंताक्रांत करणारे असले तरी जुनी पिढी आणि नवी पिढी, यातील अंतर धुके विरून जावे त्याप्रमाणे मिटून जाऊ शकेल. फक्त अवैरत्व, सामंजस्य आणि अतूट स्नेहभाव निष्कलंक राहायला हवा. बुद्ध म्हणाले होते-
न हि वेरेन वेरानि समन्तीध कुदाचनं
अवेरेन च सम्मन्ति... वैराने वैर कधीच शमत नाही. मैत्री स्नेहभाव यामुळेच वैराचे शमन होते.
......
गंगाधर पानतावणे हे 'अस्मितादर्श'चे प्रमुख संपादक, मराठीचे नामवंत प्राध्यापक, ज्येष्ठ विचारवंत आणि दलित साहित्याचे चिंतनशील अभ्यासक आहेत.
No comments:
Post a Comment