*शिवभारत संपले.*
दुःखाचा एकदम टवका उडाला. सर्वांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू वाहू लागले. सर्वांच्या हृदयात अकांत उडाला. तोंडातून शब्द उमटेना. केवढी धुरंधर माणसे ही ! पण दुःखाश्रूंचा लोंढा फुटला त्यांच्या काळजातून. जणू सह्याद्रीची शिखरे आणि स्वराज्यातील निधड्या छातीचे किल्ले ढसाढसा रडूं लागले.
महाराज..!!
महाराज..!!
पण महाराज अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले , "तुम्ही चुकुर होऊ नका. हा मृत्यूलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो."
केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले.! महाराज दक्षिणदिग्विजयाला निघाले ! होय फार फार प्रचंड दिग्विजयाला निघाले. पण सर्वांना कायमचे सोडून, सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले ! महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला !
सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते.
आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले ! आजवर जिंकलेले राज्य, किल्ले, हत्ती, घोडे, धनदौलत सोडून देऊन , आजवर जोडलेल्या आप्त -इष्ट -मित्रांची मोहमाया सोडून , आजवर मिळवलेली सर्व यशकीर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशीच सोडून देऊन , कशाकडे मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचे बोट धरून संथपणे निघून गेले
आणि शिवभारत संपले !
काय लिहू ?
शब्दच संपले !
तव शौर्याचा एक अंश दे,
तव धैर्याचा जरा स्पर्श दे,
तव तेजांतिल एक किरण दे,
जीवनांतला एकच क्षण दे !!
*छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी.*
*चैत्र पौर्णिमा*
-
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
No comments:
Post a Comment