Sunday, 22 September 2024

गणपती बाप्पाचे विसर्जन की विटंबना

तमाम गणेश भक्तांना, तसेच सर्व गणेश मंडळाना माझी नम्रतेची विनंती आहे. जर तुम्हाला आपल्या देवतांचे पावित्र्य जपता येत नसेल तर मनोरंजन म्हणून गणपती बाप्पा ची स्थापना करू नका. आपले देवी देवता म्हणजे खेळण्यातील मनोरंजनाचे साधन नाहीत. कोणी दीड दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस तर कोणी 21 दिवस गणपती बाप्पा ची स्थापना करून मनोभावे सेवा करता तसेच गणपती बाप्पा कडे विघ्न दूर करण्याची, स्वतः च्या भरभराटीची मागणी करता. आणि विसर्जना दिवशी घरात भावुक होऊन निरोप देता. हाच भावुक पणा गणपती बाप्पा ला नाल्यात, डबक्यात, तलावात, नदीत, समुद्रात विसर्जन करताना आपल्या गणरायाचे कोणतेही पावित्र्य न जपता अक्षरशः वरून कचऱ्याप्रमाणे फेकून देता. एवढा ढोंगीपणा. कुठे फेडाल हे पाप. आणि कोणत्या तोंडाने बोलता रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्यावर्षी लवकर या. कशाला पुन्हा स्वतः ची विटंबना करून घ्यायला. रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाला आणि आपल्याला ते हात पाय तुटलेले बघायला भेटले तर आपली हळहळ होते. त्या व्यक्तीविषयी मनामध्ये अक्षरशः तळमळ निर्माण होते. आणि अश्या विचित्र प्रकारे गणपती बाप्पा चे विसर्जन करतोस तेव्हा आपल्या देवाचे हात पाय मस्तक तुटलेलं पाहून तुझं काळीज तुटत नाही का रे. आपल्या लेकरासाठी खुप सारे आशीर्वाद ज्या देवाकडे मागतोय त्याच लेकराला थोड खरचटलं तरी जीव आपला कासावीस होतो. इथे त्याच देवाचे अवशेष वेगवेगळे होताना दिसतात तेव्हा तुझं मन हलत नाही का रे. कोणत्या तोंडाने देवाला वरदान मागतोस. आज स्वतः च्या मुलाला असे कसे ही पडताना पाहून त्या गणराया च्या वडिलांना आईला म्हणजेच सृष्टी निर्माते महादेव, महामाया सर्वांची जननी, अन्नपूर्णा माता पार्वतीला काय वाटत असेल. आठवा पौराणिक कथा ज्या वेळी आपल्या मुलाची मान महादेवाच्या हातून उडवली गेली तेव्हा त्या आईने महा भयंकर रुप धारण केले होते. पूढे काय घडले हे आपल्या सर्वांनाच ज्ञातच आहे. नका वाट पाहू त्या माऊलीच्या क्रोधाची. जर त्या माऊलीने जर अक्रार विक्राळ रुप घेतले तर विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. असे समजा त्या माऊलीने त्या आईने आपल्याला सुधारण्याची एक साधी दिली आहे. एक लक्षात ठेवा आपणच जर आपल्या देवतांचे पावित्र्य नाही राखले तर आपण इतर धर्मातील लोकांनी आपल्या धर्माचे पावित्र्य राखावे अशी अपेक्षाच का करता. 
आणि त्यामुळे माझी सर्व गणेश भक्तांना, आणि सर्व गणेश मंडळाना नम्र पूर्वक विनंती आहे की,पुढच्यावर्षी पासुन आपण सर्व इकोफ्रेंडली गणपती बसवू आणि  आपल्या देव देवतांचे पावित्र्य आपणच राखूया. इकोफ्रेंडली गणपती घेतल्याने त्याचे विटंबन होत नाही ते लगेचच पाण्यामध्ये विरघळून जातात. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखले जाते. 
विचार करा नक्कीच मित्रांनो. मी तर म्हणतो पुढच्यावर्षी चे नियोजन याच वर्षी करा आणि आपण ज्या मूर्तिकाराकडून मूर्ती घेतो त्याला याच वर्षी सांगा की माझी पुढच्यावर्षी मूर्ती ही शाडूच्या मातीचीच असणार. आणि उंची देखील उगाजच एवढव्या नसणार. बघा किती बदल होईल निसर्गात देखील. नक्कीच गणराय आपल्याला उत्तम वरदान देतील. आणि आता जो आपला धर्म आपल्या चुकीमुळे संकटात आहे तो संकटातून मुक्त करेल. तोच योग्य दिशा देईल असा माझा माझ्या गणरायाप्रती विश्वास आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी नक्कीच लवकर या आम्ही तुमचे स्वागत ज्या प्रमाणे शास्त्रशुद्ध करतो तसेच विसर्जन देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने करू. 


No comments:

Post a Comment