सुखी कोण? तो, जो सर्वोत्कृष्ट असतो किंवा जो यशस्वी जीवन जगण्याच्या कलेत निष्णात असतो. या दोघांपैकी तुम्ही कुठलेही एक बना. अन्यथा तुमच्या सुखाच्या वाटेत तुमचे स्वतःचेच विचार व मानसिक प्रतिमा अडथळा निर्माण करीत राहतील.
सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत. म्हणून तुमच्यात जे काही सद्गुण असतील त्यावरच लक्ष केंद्रित करा, त्यांचाच विचार करा, त्यांचीच प्रशंसा करा व त्यांचाच विकास करण्याच्या प्रयत्नांना गती देत रहा.
याउलट सतत भीती, चिंता, राग, द्वेष व अपयशांच्या विचारांमध्ये गढून राहाल तर दुःखी व खिन्नच राहाल. म्हणून तुम्ही सुखाची निवड प्रथम करा. तसेच "मी बाह्य वस्तू मिळाल्याने सुखी होईल" हा गैरसमज काढून टाका. कारण सत्य तर हेच होय, की तुम्ही सुखाची निवड कराल तरच बाह्य गोष्टींना तुमच्याकडे आकर्षीत करु शकाल.
म्हणून आजपासून तुम्ही तुमच्यातील उत्तमोत्तम व सर्वश्रेष्ठ गोष्टींनाच व्यक्त करीत रहा. असे केल्यानेच तुम्ही सुखाची निवड करीत राहाल व जीवनाचा खरा आनंद लुटू शकाल. पण त्याकरिता दोन गोष्टींचे भान जरुर ठेवा.
1) "सुखाचे साम्राज्य माझ्या विचारात व भावनेत अाहे, धन-संपत्तीत नव्हे. ती तर सुखाची निवड केल्यावर आपोआपच माझ्याकडे येत राहील. म्हणून मी सुखाची निवड करीत आहे" हा अनमोल संकल्प वारंवार चित्तात ठसवत रहा.
2) दररोज सकाळी उठल्यावर डोळे उघडताच स्वतःशी म्हणा, "मी आज सुखाची निवड करीत आहे. मी आज यशाला निवडत आहे. योग्य कर्मांना आणि प्रेमाला निवडत आहे. सद्भाव आणि शांतीला निवडत आहे." त्यानंतर दिवसभर सुखाच्या भावनेत जेवढे प्रेम ओतता येईल तेवढे आेता.
No comments:
Post a Comment