Saturday, 15 April 2017

जीवनाचे उद्दिष्ट कसे निश्चित करावे?


                जीवनाचे उद्दिष्ट कसे निश्चित करावे?

                उत्तर

                 सफल जीवनाकरिता तुम्ही दोन प्रकारची उद्दिष्टे साधावयास हवी.
                 1) वस्तूनिष्ठ उद्दिष्ट
                 2) व्यक्तीनिष्ठ उदिष्ट
         प्रत्येक वस्तूनिष्ठ उद्दिष्ट  भौतिक जगाशी आणि व्यक्तींशी संबंधित असते.
                 तुम्हाला भौतिक जगातील ज्या वस्तू प्राप्त करावयाच्या आहेत, ज्या गोष्टींच्या मिळकती मिळवायच्या आहेत आणि ज्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करावयाचे आहे, ज्यांचे बरोबर स्नेह संबंध जोडायचे आहेत, त्या करिता ठरविलेली सर्व प्रकारची उद्दिष्ट्ये वस्तुनिष्ठ आहेत आणि या उद्दिष्टांची प्राप्ती करण्याकरिता तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागतो.
                  या उद्दिष्टांची प्राप्ती करण्याकरिता तुम्ही
                  1) "मला काय हवे आहे",
                  2) "ते मला का हवे आहे",
                  3) "कधीपर्यंत हवे आहे", आणि
                  4) "कशाप्रकारे मिळवायचे आहे",
                  याप्रकारचे नियोजनात्मक विचार व त्यानुसार कृती करीत जा,म्हणजे त्यामुळे तुम्हाला सुख प्राप्ती होते,मिळकती मिळतात आणि तुम्ही समृद्ध होता.
                  त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात व्यक्तीनिष्ठ उद्दिष्ट तुम्ही निश्चित करावयास हवे. व्यक्तीनिष्ठ उद्दिष्ट्ये भौतिक जगाशी संलग्न नसतात, ती अंतरजगाशी संलग्न असतात. तुमच्या अंतरातून, मनातून, बुद्धीतून आणि चित्तातून तुमच्या कलागुणांना आणि क्षमतांना तुम्ही प्रगट करता, ती सगळी तुमची व्यक्तिनिष्ठ उद्दिष्टे असतात.
                  जसे, इतरांवर प्रेम करणे, अंतरातून आनंद निर्माण करून इतरांना आनंद देणे किंवा कुठल्याही कलागुणांचा विकास करून इतरांना सेवा देणे, किंवा गायन करणे, चित्र काढणे इत्यादी...
                  ज्या ज्या वेळी तुम्ही तुमच्या अंतरातून, तुमच्या कलागुणांना प्रकट करून इतरांची सेवा करता त्यावेळी तुम्हाला समाधान प्राप्त होत असते.
म्हणून तुम्ही दोन्ही प्रकारच्या उद्दिष्टांची कास धरा, जीवनात दोघांनाही महत्व द्या म्हणजे तुमची अंतरबाह्य उन्नती  होत राहील व तुम्हाला भौतिक जगातील मिळकतींद्वारे सुखाची आणि अंतरातील कलागुणांच्या व क्षमतांच्या विकासातून समाधानाची प्राप्ती होईल.
                  सुख व समाधान यांचा लाभ झाला म्हणजे तुमचे जीवन ख-या अर्थाने समृद्ध व संपन्न होईल.

                

No comments:

Post a Comment